यशोगाथा
राज्याच्या चार खात्यांचा कारभार सांभाळत असताना लातूर जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून संभाजी पाटील निलंगेकर हे काम करीत आहेत. घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे त्यांचे निलंगा विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघातील सर्वच घटकांना सोबत घेऊन विकास सुरू केला आहे. या मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
अन शेतकऱ्यांना मिळाला मावेजा
मांजरा नदीवर धनेगाव येथे बॅरेजेस उभारण्यात आला आहे. बॅरेजसमध्ये पाणी थांबून या भागाचा विकास होईल याकरिता शेतकऱ्यांनी कोणत्याही तक्रारी न करता शासनाला जमिनी दिल्या. हे बॅरेजेस तयार करून दहा बारा वर्षे झाली तरी त्याचा मावेजा मात्र शेतकऱ्यांना मिळत नव्हता. शेतकऱ्यांनी अनेक वेळा शासनदरबारी हेलपाटे घातले तरी त्यांच्या पदरी निराशाच आली. पण पालकमंत्री म्हणून संभाजी पाटील-निलंगेकर यांनी पहिल्यांदा या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत या शेतकऱ्यांना ५४ कोटींचा मावेजा मिळवून दिला.
निलंग्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट
एखाद्या शहराला नेतृत्व चांगले मिळाले की त्या शहराचा विकास होण्यास काहीच वेळ लागत नाही. असेच काहीसे निलंगा शहराच्या बाबतीत झाले आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपाने या शहराला तरुण नेतृत्व मिळाले. त्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने शहरासाठी अधिकच फायद्याचे ठरले. श्री. निलंगेकर यांनी निलंगा शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंटच तयार केली आहे. यातून नगरपालिकेच्या माध्यमातून १७५ कोटींची कामे मंजूर करण्यात आली. काहीच्या कामालाही सुरुवात झाली आहे. स्वच्छ व सुंदर निलंगा शहर करण्यासाठी ठिकठिकाणी उद्यान, सुशोभीकरण, अटल वॉक, जिजाऊ सृष्टी असे विविध उपक्रम त्यांनी हाती घेतले. लहान मुलांसाठी साडे चार कोटी रुपये खर्चून ॲमेझिंग पार्क उभारण्यात आले.